मंगळवार, १५ डिसेंबर, २०१५

आम्ही शाळकरी १९९४ कट्टा

पहिली ते दहावी पर्यंत एकच शाळा असा काही माझा शालेय प्रवास नव्हता. मुंब्रा मध्ये असताना बालवाडी पर्यंत इनामदार मैडम कडे त्यांनंतर पहिली ते चौथी महानगर पालिकेच्या शाळेत आणि नंतर ५ ते ७ ब.स.जोंधळे मुंब्रा येथे आणि त्यांनंतर डोंबिवली मध्ये आल्यावर ८ ते १० महात्मा गांधी शाळेत पण सर्वाधिक मनोरंजक आठवणी असतील त्या मुंब्रा येथील जोंधळे शाळेच्या. शाळा सोडून इतकी वर्ष झाल्यावर फेसबुकवर मित्रांना शोधता शोधता पहिला दीपक लगड सापडला पण त्याचा पाठमोरा असेलला फोटो आणि पठ्या आता दुबई मध्ये आहे समजल्यावर हा भेटणे तर शक्यच नाही म्हणून मग किशोर जाधवला शोधला तर तिकडे मोठाले केस असलेला भलताच माणूस सापडला. हा नक्की किशोरच नसणार असे मला वाटले तरी सुद्धा त्याचा फोटो मी बाबांना दाखवला (आमचे बाबा आणि किशोरचे बाबा मित्र आणि बाबा अधून मधून मुंब्रा मध्ये भेटत असतात) ते सुद्धा म्हणाले हाच किशोर आहे म्हणून मग त्याला फ्रेंड म्हणून add केले मग त्यांनी सुद्धा प्रतिसाद देऊन माझा फोन नंबर मागून घेतला. आणि दुसऱ्या दिवशी दुपारी त्याचा फोन पण आला आणि पहिली आठवण काढली ती सुद्धा तीन पायाची शर्यतीची जी न विसरता येणारी. शाळेत ही स्पर्धा जिंकण्यासाठी किशोरने शक्कल काढली आणि मला म्हणाला "तू माझ्या पायावर पाय दे आणि धाव" आणि आम्ही तसेच धावलो. त्याचा पाय माझ्या पायामुळे दुखत असताना सुद्धा आम्ही जिंकलो.हे बघून जाधव मैडम मला म्हणाल्या "तू मोठा झाल्यावर स्वतःच्या पायावर उभा राहशील तेव्हा राहशील पण आता मात्र तीन पायाची शर्यत जिंकायला तुला किशोरचा पाय लागणार". खरे म्हणजे आता मोठा झाल्यावर माझ्या सर्व शाळेतल्या मित्रांना जमा करण्यात मला त्याच्याच पायाची गरज लागली. 

किशोर नंतर पराग ची ओळख झाल्यावर एकदा भेटायचे ठरले, मंदार सोमण डोंबिवली मध्येच भेटायचा पण काही कारणामुळे पराग आणि मंदार येऊ शकले नाही एकटा किशोरच आला गप्पा झाल्या,हि गोष्ट असेल साधारण २०११ सालची पण पुढे काहीच झाले नाही.बाळासाहेब आजारी असताना किशोरला फोन केला इतकाच.माझ्या महात्मा गांधी शाळेतील मित्रांनी whatsapp वर ग्रुप बनवला होता तो बघून मी सुद्धा २०१३ साली whatsapp वर ग्रुप बनवला त्यात मी किशोर आणि पराग आम्ही तिघेच होतो. मंदार कडे त्यावेळी whatsapp नव्हता.तेव्हा पासून मी किशोरला इतर मित्रांना शोधायला सांगायचो तो शोधतो म्हणायचा कधी कधी याला add कर त्याला add कर म्हणायचा नंबर मागितला कि मात्र गायब व्हायचा.एकदा पराग ने सुद्धा त्याच्या वडिलांनी गावी शाळकरी मित्राचे झालेल्या गेट-टुगेदरचे फोटो शेअर केले तेव्हा सुद्धा आपले पण असेच झाले पाहिजे असे नाही का वाटत तुम्हाला असे विचारले होते पण पुन्हा एकदा प्रतिसाद शून्य मिळाला शेवटी कंटाळून २०१४ सालच्या सुरुवातीला ग्रुपच डिलीट करून टाकला.पुन्हा एकदा माझ्या महात्मा गांधी शाळेतील मुलांनी गेट-टुगेदर केले आणि पुन्हा मला आपल्या जोंधळे शाळेतील मित्रांची आठवण झाली त्यामुळे ऑफिस मधून सकाळी परत येत असताना ६ ऑगस्ट २०१४ रोजी पुन्हा हा whatsapp ग्रुप सुरु केला त्यावेळी मात्र परागने पुढाकार घेऊन काही जणांना add केले आणि शेवटी १५ ऑगस्ट २०१४ ला आपल्या शाळेत भेटायचे ठरले.

तसे भेटायचे शाळेत ठरले होते,पण किशोर आणि पराग स्वागतासाठी मुंब्रा पोलिस स्टेशन च्या समोरचा उभे राहिले.दोन दशकानंतरची भेट म्हणजे खूप मोठा बदल होणे स्वाभाविकच होते तसा तो बदल आमच्या शाळकरी मित्रामध्ये पण दिसत होता.प्रत्येक मित्राची एन्ट्री सुद्धा तितकीच जोरदार होत होती. सर्व एकत्र आल्यावर शाळेत मध्ये गेलो तो पर्यंत शाळा खाली झाली होती मग काय आमच्या गप्पा रंगल्या. प्रत्येक जण शाळा सोडून झाल्यावर काय काय केले त्याचे अनुभव सांगत होते त्यात सर्वात जास्त लक्षात राहिला तो नरेंद्राचा प्रेम आणि मग लग्नाचा विनोदी अनुभव आणि जयेशची उद्योग गाथा. सर्वजण इतके भरभरून बोलत होते कि मीच काही वेळ निशब्द झालो (मनात म्हणालो आता बोलून घ्या हवे तेवढे नंतर माझेच ऐकावे लागणार आहे) प्रत्येकाने भरपूर मेहनत केली होती हे प्रत्येकाचे अनुभव ऎकुन जाणवत होते. इतक्या वर्षानंतर पुन्हा भेटण्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. प्रत्येकाला पुन्हा आपल्या मित्रांची नव्याने ओळख करून घेण्याची उत्कंठा होती त्यामुळेच कि पुन्हा एकदा २० वर्ष मागे गेल्याचा भास होत होता. हे भेट पुढे आम्ही शाळकरी १९९४ ग्रुप च्या अनेक उपक्रमात पूरक ठरली.(क्रमश:)    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: